पावसाअभावी नुकसान झालेल्या क्षेत्राचाही विचार करावा – नरहरी झिरवाळ

नाशिक सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करणे आवश्यक असून पंचनामे करताना एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून पंचनामे करण्याचे नियोजन प्रशासनाने करावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या बैठकीस कृषी मंत्री दादाजी भुसे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नरेंद्र दराडे, डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, सुहास कांदे, हिरामण खोसकर, नितीन पवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे पंचनामे हे बिनचूक करण्यात येवून केलेल्या पंचनाम्यांचा अहवाल लवकरात लवकर शासनाला सादर करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळण्यासाठी मदत होईल, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

सुक्ष्म  तांत्रिक बाबींसह करावेत पंचनामे कृषिमंत्री दादाजी भुसे

कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, पिक विम्याचा लाभ हा ई-पीक पाहणीच्या अहवालावर अवलंबुन असल्याने यासारख्या सुक्ष्म तांत्रिक बाबींचा विचार करून पंचनामे करण्यात यावेत, जेणे करून एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही. तसेच पिकविमा कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचारी यांची तालुकानिहाय यादी सर्व लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येवून पंचनामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच एसडीआरएफ च्या धर्तीवर पंचनामे पूर्ण शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात यावे, असेही कृषि मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

पावसाअभावी नुकसान झालेल्या क्षेत्राचाही विचार करावा : नरहरी झिरवाळ

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले, जिल्ह्यातील ज्या भागात पावसाअभावी पिकांची हानी झाली आहे. त्या क्षेत्राचे देखील पंचनामे करण्यात यावेत. जेणे करून तेथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदत होईल, असेही विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –