स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना सेवकांचे काम कौतुकास्पद – दादाजी भुसे

मालेगाव – कोरोना महामारीच्या सुरवातीला अनेक लोकांना या आजाराने बाधीत केले, अनेकांचे उद्योग, कामधंदे बंद पडले. मोठ्या कालावधीसाठी आपल्याला लॉकडाऊनचा सामना  करावा लागला. या संकट काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना सेवकांचे काम निश्चितच कौतुकास्पद असून त्यांचा सन्मान करून या कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याची  जबाबदारी सर्व मालेगावकरांची असल्याची भावना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मालेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांच्यावतीने शहरातील पोलीस कवायत मैदान येथे कोरोना सेवकांच्या सन्मान सोहळ्याच्या आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री.भुसे बोलत होते. या कार्यक्रमाला उपमहापौर निलेश आहेर, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बि.जी.शेखर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी श्रीमती माया पाटोळे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, रामा मिस्तरी, संजय दुसाणे यांच्यासह सर्वधर्माचे धर्मगुरु आदीसह शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर संस्थाचे पदाधिकारी, समाजसेवक, करोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणारे सर्व क्षेत्रातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोना कालावधीमध्ये शासन, प्रशासनासह नागरिकांनी सामाजिक संकटाचा मुकाबला केल्याचे सांगतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, या संकट काळात आपल्यातील चांगले लोक आपल्याला सोडून गेले आहेत. अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये ज्ञात अज्ञात अनेकांनी या आजाराचा सामना केला, आपापल्या परिने रुग्णांची सेवा करण्याची जबाबदारी पार पाडली म्हणून ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून, घरावर तुळशीपत्र ठेवून रुग्णांची सेवा केली त्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात आपण आज सन्मान करित आहोत. परंतु कोरोना अजुनही संपलेला नाही. कोरोनाच्या नवीन विषाणूचे संकट संपूर्ण देशावर घोंगावत असतांना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्याचे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.

मागील दोन वर्षात कोरोनाची पहिली व दुसरी लाट आली त्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील संस्था व महानुभावांनी अतिशय समर्पित भावनेने रुग्णांची सेवा केली, त्या रुग्णसेवेला मालेगावकरांच्या वतीने आभार व ऋण व्यक्त करण्यासाठी  कोरोना सेवकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. दादाजी भुसे यांनी याप्रसंगी दिली. कार्यक्रमाचे सुरुवात सर्व धर्मगुरूंच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार  अर्पण व दिपप्रज्वन करुन करण्यात आली.

प्रशासनातील तळागाळातील लोकांनी कोरोनाच्या संकटात मोलाचे योगदान दिल्याची भावना व्यक्त करतांना जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले, मालेगाव पॅटर्नमुळे एक यशोगाथा तयार झाली आहे. जिल्हाधिकारी या नात्याने मलाही मालेगाव पॅटर्नबद्दल विचारणा होते. त्यावेळी मी एकच सांगत असतो, पोटतिडकीने काम करणारे कर्मचारी, त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी, आणि त्यांच्या कर्तृत्वावर कौतुकाची थाप देणारे लोकप्रतिनीधी हे संयोजन एकत्र आल्यावर कुठल्याही सामाजिक संकटावर मात करणे सहज शक्य असल्याची भावना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलतांना नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर म्हणाले, अनेकांचे सत्कार आम्ही पाहिले आहेत, परंतू तळागाळातील कोरोना सेवकांचा अमृत महोत्सवी वर्षी करण्यात येणारा सत्कार हा सामाजिक एकोपा आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा आहे. या सेवकांच्या कार्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाच्या समुळ उच्चाटनाला वेळ लागणार नाही, असे मत पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी मांडले.

हा कार्यक्रम शासनाच्या संपूर्ण नियमांचे पालन करुन आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मालेगाव शहर व तालुक्यातील सर्व नागरिक समाजसेवक पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेणाऱ्यांचे मंत्री श्री. भुसे यांनी आभार मानले.

महत्वाच्या बातम्या –