अमरावती – नागरिकांच्या विविध समस्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी 178 तक्रारींचा आज निपटारा करण्यात आला असून आवश्यक तिथे शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय व कार्यवाही करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांनी जनता दरबार घेतला. यावेळी पालकमंत्र्यांनी प्राप्त निवेदन तसेच नागरिकांनी समक्ष भेटून मांडलेल्या निवेदनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सर्व संबंधित नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून या संबंधी प्रशासनाला कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करू. नागरिकांच्या अडचणींच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिली.
शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांच्या समस्या, प्रश्न निकाली निघाव्यात व त्यांना न्याय मिळावा यासाठी जनता दरबार हा उपक्रम आहे. यानिमित्ताने त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, प्रश्न जाणून घेतले.
यावेळी नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत तत्काळ कार्यवाहीचे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. विविध ठिकाणांहून आलेले तक्रारदार नागरिक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद विविध विभागाचे अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पात्र शेतकऱ्यांना त्वरीत लाभ द्यावा – गुलाबराव पाटील
- राज्यातील या जिल्ह्यांमध्ये २ दिवस विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार; हवामान खात्याचा अंदाज
- पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण कराव्यात – नरेंद्र मोदी
- कोरडे बदाम खाताय? त्यापेक्षा भिजवलेले बदाम खा; भिजवलेले बदाम आरोग्यास लाभदायक