प्राणिजन्य आजार रोखण्यासाठी पशुवैद्यकशास्त्रातील संशोधनाला चालना द्यावी – सुनील केदार

नागपूर – प्राणिजन्य आजारांमुळे भविष्यात कोविडसारखे संकट उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे आजार वेळेत रोखण्यासह त्यांचा मानवाला संसर्ग होवू नये, यासाठी पशुवैद्यकशास्त्रात संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचे प्रतिकुलपती सुनील केदार यांनी केले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचा दहावा पदवीदान समारंभ श्री. केदार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. वैज्ञानिक व औद्योगिक विभागाचे सचिव तथा वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे दूरदृश्य प्रणालीद्वारे या समारंभात सहभागी झाले होते. कुलगुरू कर्नल डॉ. आशिष पातुरकर, कुलसचिव सचिन कलंत्रे, अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. उपाध्ये, डॉ. पी. टी. जाधव, डॉ. वासनिक आदी यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण अर्थकारणात पशुपालन हा महत्वाचा घटक आहे. महात्मा गांधींनी मांडलेली ग्रामविकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पशुसंवर्धन महत्वाचे ठरणार आहे. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात संशोधन करून प्राणिजन्य आजार रोखण्यासोबतच पशुसंवर्धनासाठी उपयुक्त संशोधनावर भर द्यावा. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणात पशुवैद्यकशास्त्राचे योगदान महत्वपूर्ण ठरणार असून यासाठी विद्यापीठाने नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे श्री. केदार यांनी सांगितले.

जगभरात कोविडमुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक घटक या महामारीमुळे प्रभावित झाला. प्राणिजन्य आजारामुळे मानवी जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्याची अशी अनेक उदाहरणे आहेत. यापुढेही अशी आव्हाने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राणिजन्य आजारांना रोखण्याच्या पूर्वतयारीमध्ये पशुवैद्यकशास्त्राची महत्वपूर्ण भूमिका राहणार असून पशुवैद्यकीय संशोधन हे मूलभूत विज्ञान, प्राणी आणि मानवी आरोग्याचा दुवा म्हणून काम करते, असे श्री. मांडे म्हणाले. कोविड काळात नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाने 25 हजार मानवी कोविड चाचण्या केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

आयसीएमआर-एनआयव्ही आणि माफ्सू यांच्या सहकार्याने नागपुरात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन वन हेल्थ’ ही संस्था सुरु होत असल्याबद्दल श्री. मांडे यांनी समाधान व्यक्त केले. ‘वन हेल्थ’ अंतर्गत पशुवैद्यकीय, मानव, पर्यावरण विज्ञान आदी क्षेत्रातील शास्त्रज्ञांसाठी एकाच छताखाली बीएसएल-3 आणि बीएसएल-4 प्रयोगशाळा अत्यंत महत्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी सांगितले.

डॉ. पातुरकर यांनी प्रास्तविकामध्ये विद्यापीठाच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. पशु आणि मत्स्यपालन क्षेत्राची उत्पादकता, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी, तसेच दुग्ध तंत्रज्ञानातील संशोधनासाठी विद्यापीठ कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाने गेल्या दोन वर्षात शिक्षण, संशोधन क्षेत्रात केलेल्या कामगिरीचीही माहिती दिली.

1253 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

पदवीदान समारंभामध्ये 2018-19 व 2019-20 वर्षात पशुवैद्यक, मत्स्य विज्ञान तसेच दुग्ध तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, तसेच 2020-21 या सत्रातील मत्स्य विज्ञान व दुग्ध तंत्रज्ञान शाखेच्या एकूण 939 उमेदवारांना स्नातक, 275 उमेदवारांना स्नातकोत्तर आणि 39 उमेदवारांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. तसेच विशिष्ट गुणवत्तेसाठी 59 सुवर्ण, 15 रजत पदके आणि प्रत्येकी 25 हजार रुपयांची दोन पारितोषिके वितरीत करण्यात आली. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाची 2018-19 शैक्षणिक सत्रातील विद्यार्थिनी रितू पांघल हिने सात सुवर्ण आणि चार रजत पदके पटकाविली, तर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयची विद्यार्थिनी नाम्बीर जासना सुरेश हिने 2019-20 वर्षामध्ये उत्तम गुणांकन प्राप्त करून पाच सुवर्ण पदके आणि एक रोख पारितोषिक पटकाविले.