जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योगवाढीसाठी प्रयत्न करणार – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर चंद्रपूर हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात कापूस, धान, वनउपज आदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. भविष्यात प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी तसेच नागरिकांचे आयुष्य वाढविण्यासाठी जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योग आणण्याला आपले प्राधान्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य होईल, असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

स्थानिक एन.डी. हॉटेल येथे एमआयडीसी असोसिएशनद्वारे आयोजित ‘संवाद उद्योजकांशी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांच्यासह मुख्य मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार बाळू धानोरकर, आमदार सर्वश्री सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सुबोध मोहिते, प्रवीण कुंटे पाटील, मनोहर चंद्रिकापूरे उपस्थित होते.

जिल्ह्यात कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, औष्णिक विद्युत केंद्र यामुळे प्रदूषणाची समस्या वाढली आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, उद्योगांच्या वाढीसाठी आपण नेहमीच समर्थन केले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होत असल्यामुळे टेक्सटाईल पार्कची आवश्यकता आहे. तसेच देशात धानाची निर्यात करणा-या चंद्रपूर जिल्ह्यात धानाच्या बाय-प्रॉडक्ट्सपासून इथेनॉलची निर्मिती शक्य आहे. त्यामुळे कृषी, वनउपज यावर आधारीत पर्यावरणपूरक उद्योगांना भविष्यात प्राधान्य राहील. उद्योगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. कामागारांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकही उद्योग बंद पडला नाही. भविष्यात नवीन चंद्रपूरची संकल्पना अंमलात आणावी लागेल असेही पालकमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.

महत्वाच्या बातम्या –